लातूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे राज्यभर प्रचार करताना नोटबंदीनंतर जुन्या झालेल्या नोटाना आम्ही सत्तेत आल्यास बदलून देऊ असा दावा करीत आहेत. याविषयी त्यांना लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे प्रचार सभेसाठी आल्यानंतर विचारलं असता त्यांनी पंतप्रधानांना नोटबंदीचा निर्णय घेण्याचाच अधिकार नसल्याचे म्हटले आहे. जर नोटबंदीचा निर्णयच घ्यायचा असेल तर सरकार बोर्ड ऑफ गव्हर्नरला नोट बंदी करू शकते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटबंदी ही नियमांना डावलून केलेली असून याप्रकरणी सुप्रीम कोर्टानेही पंतप्रधानांवर ताशेरे ओढल्याचा दावा यावेळी आंबेडकर यांनी केला. मुळात प्रत्येक नोटांवर त्या नोटांचे व्हॅल्यू देण्याचे वचन छापले जाते. त्यामुळे त्या बदलून देणं शक्य असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात बॉम्बस्फोट-जवानांवर हल्ले करणाऱ्या अतिरेक्यांना फूस देणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देणाऱ्या भारताच्या पंतप्रधानाना चक्क दंगलखोराची उपमा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. नरेंद्र मोदी हे पाकिस्तान सोबत दुश्मनची,धडा शिकवण्याची भाषा करतात. लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला तोडण्याची भाषा करतात. त्यामुळे देशाचा प्रमुख म्हणजेच पंतप्रधान हा दंगलखोर असल्याचे खळबळजनक वक्तव्य आंबेडकर यांनी केलं आहे. 


मुळात पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राने आपल्या देशात अतिरेकी कारवाया करणे, भारताच्या जवानांवर हल्ला करून त्यांच्या हत्या केल्यानंतर त्यांच्यासोबत मैत्रीचीच भाषा करावी का ? असा सवाल प्रकाश आंबेडकर निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदी हे कधीच मैत्रीची भाषा बोलत नसल्याचा आरोप करताना आंबेडकर यांनी पाकिस्तानची बाजू घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान देशातील निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा स्वतःला राजा समजत असेल तर निवडणुकीत आपटा असे आवाहनही यावेळी आंबेडकर यांनी केलं. काही जणांनी लोकसभा निवडणूक ही कुटुंबासाठी तसेच पैसेवाल्यांसाठी केली आहे त्यामुळे त्यांनाही धडा शिकवण्याचं आवाहन आंबेडकर यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील सभेत बोलताना केलं.


आंबेडकरांविरूद्ध गुन्हा  


निवडणूक आयोगा बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळ येथे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत आंबेडकर बोलत असताना पुलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला आमची सत्ता आल्यास दोन दिवस कारागृहात टाकू, असे आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.