नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि सर्वपक्षीय गटनेत्यांनी बनवलेल्या नव्या आचारसंहितेसह आज लोकसभेत कामकाज होणार आहे. नव्या आचारसंहितेनुसार हौदात येऊन गोंधळ घालणाऱ्या खासदारांना तात्काळ निलंबित करण्यात येणार आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही दिवस सुरळीत कामकाज होऊ शकलेलं नाही. गेल्या आठवठ्यात काही खासदार लोकसभेच्या हौदात उतरुन पोस्टरबाजी आणि घोषणाबाजी करताना आढळून आले. त्यानंतर उद्विग्न झालेल्या लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत गोंधळी खासदारांवर कडक कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आज पासून नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज लोकसभेत तिहेरी तलाक बिलवर चर्चा होणार आहे. या मुद्द्यावर संसदेत जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसने आपल्या सगळ्या खासदारांना संसदेत हजर राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. याआधी मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक ज्याला तिहेरी तलाक असं देखील म्हटलं जातं. हे बिल लोकसभेत पास झालं होतं पण राज्यसभेत हे बिल पास होऊ शकलं नव्हतं. त्यानंतर काही बदल केल्यानंतर आता पुन्हा लोकसभेत हे बिल मांडलं जाणार आहे. तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. सरकार आणि विरोधी पक्षाने देखील याबाबत सहमती दर्शवली आहे. मागील आठवड्यात २७ डिसेंबरला या विधेयकावर चर्चासाठी सहमती झाली होती. काँग्रेसने देखील या चर्चेत सहभागी होण्याची तयारी दाखवली होती. काँग्रेसने देखील आज आपल्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. 


गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, कायदे मंत्री रविशंकर प्रसाद आणि कायदे राज्यमंत्री पी पी चौधरी हे या समितीचे सदस्य होते. २२ ऑगस्ट २०१७ ला सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाक हा बेकायदा आणि असंवैधानिक असल्याचं म्हटलं होतं. यावर्षी तिहेरी तलाकची १७७ प्रकरणं समोर आली होती. कोर्टात यापैकी ६६ प्रकरणं सादर केली गेली होती. यामध्ये उत्तर प्रदेश सगळ्यात पुढे आहे. यामुळे सरकारने तिहेरी तलाक कायदा करण्याचा निर्णय घेतला होता.