रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली : राज्यात सत्तांतरानंतर आता पक्षांतराची दिशा बदलली आहे. भाजपने (BJP) आता महाभरतीचं लक्ष्य ठेवलंय. महाराष्ट्रात अनेक काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीचे (NCP) स्थानिक नेते, माजी आमदार, पदाधिकारी यांना गळाला लावण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झालेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या या मोहिमेला यशही मिळू लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. माढ्याचे आमदार बबन शिंदे भाजपमधअये प्रवेश करणार आहेत. बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहेत.  


भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पुढील विधानसभा- लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील विविध भागात राजकीय मेगाभरतीचं लक्ष्य ठेवलंय. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत थांबा आणि वाट पाहा असं धोरण अनेकांनी स्वीकारलं आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. माढ्यामधून शरद पवार हे खासदार झाले होते, त्यामुळे माढ्या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड आहे.


पण आता माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. बबन शिंदे आणि राजन पाटील हे सोलापूरमधले राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. आज दिल्लीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी याबाबत मध्यस्थी केली. 


दरम्यान, भाजप दबावतंत्र वापरत असल्याचाआरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दोन महिन्यांपूर्वी बबन शिंदे यांना ईडीची नोटीस आली होती. हे काही भाजपवरच प्रेम नाही तर दबावामुळे आमदार भाजपमध्ये जात असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे.