PM Modi Road Show: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या रोड शो दरम्यान मोठी चूक झाली आहे. कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो दरम्यान हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला आहे. एक तरुण हातात हार घेऊन थेट पंतप्रधान मोदींच्या अगदी जवळ पोहचला. या नंतर पंतप्रधान मोदींसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी झटापट हालचाली करत या व्यक्तीला अडवले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदींभोवती असलेले सुरक्षेचे कवच भेदून हा व्यक्ती थेट पंतप्रधान मोदींच्या जवळ कसा पोहचला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींची सुरक्षा भेदली गेली आहे. कर्नाटकातील हुबळीत हा गंभीर प्रकार घडलाय.  फुलांचा हार घेऊन तरूण मोदींजवळ पोहचल्याचे व्हिडिओत दिसत आहे.  SPG सुरक्षा भेदून हा व्यक्ती पंतप्रधान मोदींजवळ पोहचला. SPG जवानांनी तात्काळ तरूणाला पकडून दूर केले. 


पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटनासाठी कर्नाटकात आले आहेत. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदींनी रोड शो घेतला. या दरम्यान, रोड शोच्या गर्दीमध्ये एक तरुण अचानक पीएम मोदींच्या अगदी जवळ पोहोचला. या तरुणाने पंतप्रधानांना हा फुलांचा हार घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच एसपीजी जवानांनी त्याला मागे ढकलले आणि हार घालू दिला नाही. 
 



साधारण वर्षभरापूर्वी जानेवारी 2022 मध्ये पंजाब दौऱ्यावर (Punjab Visit) असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती.  पंतप्रधान मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्यादरम्यान सुरक्षेसंदर्भात त्रुटी आढळल्या होत्या. 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान मोदी हे पंजाबमधल्या हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी भटिंडा इथे पोहचले.  तेथून ते स्मारकाच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र, पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने न जाता रस्ते मार्गे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. हा रस्त्याचा प्रवास तब्बल 2 तासांचा होता.  डीजीपी पंजाब पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा  हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाककडे निघाला. प्रवासादरम्यान एका फ्लायओव्हरवर काही आंदोलकांनी रस्ता अडवला. यामुळे या आंदोलकांमुळे मोदींचा ताफा एका उड्डाणपुलावरच अडकला. या कालावधीत सुमारे 15-20 मिनिट नरेंद्र मोदी आपल्या वाहनात तसेच बसून होते. मोदींच्या ताफ्यात चिटपाखरूही शिरत नाही. मग हे आंदोलक मध्ये आलेच कसे असा प्रश्न उपस्थित झाला. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते.