लग्नाच्या हॉलमध्ये एकीकडे धुमधडाक्यात लग्न लावलं जात असतानाच एका तरुणाने आपला जीव गमावल्याची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रसमच्या (Rasam) भांड्यात पडून भाजला गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याने आपला जीव गमावला. तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तिरुवल्लूर (Tiruvallur) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर लग्नाच्या मंडपात शोककळा पसरली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 21 वर्षीय तरुण विद्यार्थी होता. कोरुक्कुपेट येथेली खासगी कॉलेजमध्ये BCA च्या शेवटच्या वर्षाला तो शिकत होता. व्ही सतीश असं त्यांचं नाव असून मोकळ्या वेळेत तो कॅटरिंगमध्ये काम करत होता. लग्नाच्या मंडपात पाहुण्यांना जेवण वाढण्यासाठी तो उपस्थित असताना दुर्दैवाने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीशचे आई वडील कामगार असून मजुरी करुन ते पोट भरतात. 


23 एप्रिलला सतीश मिंजूर येथील एका लग्नाच्या हॉलमध्ये लग्नासाठी हजर होता. पाहुण्यांना जेवण वाढण्याचं काम त्याच्याकडे होतं. यादरम्यान तो किचनमधून जात असताना त्याचा पाय घसरला आणि रसम तयार केलं जात असलेल्या उकळत्या भांड्यात जाऊन पडला. यानंतर तिथे एकच धावपळ सुरु झाली होती. 


सतीशसह उपस्थित असणाऱ्या इतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी सतीशला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. डॉक्टरांची त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर किलपॉक मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यास सांगितलं. पण येथे उपचार केले जात असतानाच सतीशचा मृत्यू झाला. 


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश गंभीर भाजला होता. पण तो उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. रविवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी कलम 174 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच सतीशच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला आहे.