Tawaif Video : तवायफ... उच्चार केला तरीही अनेकांच्याच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. मुळात ही संकल्पना नवी नसली तरीही काळ बदलत गेला तसतसं तवायफ म्हणून जगणाऱ्या महिलांचं आयुष्य बदललं. त्यांच्यापुढची आव्हानं वाढली आणि समाजात त्यांना असणरा आदर कमी झाला ही दुर्दैवी बाब. इतिहासात डोकावलं असता तवायफ, त्यांचं आयुष्य आणि इतर अनेक गोष्टी समोर येतात आणि भारावून जायला होतं. 


कोण होती इतिहासातील सर्वात सुंदर तवायफ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंतच्या नोंदींनुसार त्या काळातील सर्वात सुंदर तवायफ होण्याचा बहुमान मिळाला होता गौहर जानला. 1873 मध्ये जन्मलेल्या या तवायफला इलीन अँजेलिना हॉवर्ड अशी ओळख देण्यात आली होती. पाटण्यात जन्मलेल्या गौहरचे वडील अर्मेनियम ज्यू होते, तर आई अँग्लो इंडियन होती. 


भारतामध्ये सर्वप्रथम गाणं रेकॉर्ड करणारी अदाकारा अशी गौहरची ओळख. ती सहा वर्षांची असतानाच आईवडील विभक्त झाले आणि त्यानंतर तिच्या आईनं इस्लाम धर्म स्वीकारत बनारसला मुक्काम ठोकला. इथं गौहरच्या आईची ओळख होती, बडी मल्का जान. हे तेच ठिकाण जिथं लहानग्या गौहरला संगीत, नृत्य आणि काव्य अशा कलांची ओळख झाली. 1883 मध्ये हे कुटुंब पुन्हा कलकत्त्याला मुक्कामास गेलं जिथं गौहरला रामपुरचे उत्साद वजीर खान, कलकत्त्याचे प्यारे साहिब आणि लखनऊचे महाराज बिंदादिन यांच्याकडून संगीताचं शिक्षण मिळालं. 


हेसुद्धा वाचा : 'तवायफ' म्हणजे देहविक्री करणाऱ्या नव्हे! श्रीमंतांची मुलं ज्यांच्याकडे संस्कार शिकण्यासाठी जात 'त्या' कोण होत्या?


 


वयाच्या 14 व्या वर्षी गौहरनं दरभंगा येथील महाराजांचं मन जिंकलं आणि त्यांनी तिला दरबारातील श्रेष्ठ गायिका आणि नृत्यांगना म्हणून निवडलं. ख्याल, ध्रुपद, ठुमरी या प्रकारांमध्ये तिनं महारथ मिळवली आणि दादरा, कजरी, होरी, तराना आणि भजन या प्रकारांनी तिच्या कलेला सोन्याचा मुलामा दिला. 


1902 मध्ये तिनं चक्क ग्रामोफोन कंपनीसाठी गाण्यांचं ध्वनीमुद्रण केलं आणि भारतातील पहिली सुपरस्टार होण्याचा मान मिळवला. पुढील दोन दशकं तिनं जवळपास 10 भाषांमध्ये 600 गाणी गायली, ध्वनीमुद्रिकतही केली. त्या काळात ती गायनाच्या एका बैठकीसाठी 1000 ते 3000 रुपये इतकं मानधन घेत होती. गौहरनं पुढे सय्यद गुलाम अब्बास या तिच्या तबला वादकाशी निकाह केला, पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. ज्यानंतर तिनं अखेरच्या श्वासापर्यंत गुजराती कलाकार अमृत वागल नायकसोबतच आयुष्य व्यकीत केलं. 1928 मध्ये बऱ्याच नवनवीन ठिकाणांना भेट दिल्यानंतर गौहर म्हैसूरच्या शाही घराण्यासाठी राजदरबारी गाऊ लागली. तिथं तिनं 18 महिने कला सादर केली.



शाही बग्ग्घी, कार, घोडेस्वारी या अशा आवडीनिवडींमुळं तिला मुंबई गाठता आली. जाणून आश्चर्य वाटेल पण तिनं तिच्या पाळीव मांजरांच्या लग्नावर 1200 रुपये खर्च केले होते. उतारवयात मात्र गौहरला वाईट काळ पाहावा लागला, आर्थिक चणचणही जाणवली. वयाच्या जवळपास 60 व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. गौहरचं अस्तित्वं नाहीसं झालं पण, कलेच्या रुपानं ती कायमच भारताच्या इतिहासात सर्वांसमोर येत राहिली हेसुद्धा तितकंच खरं. 
(माहिती सौजन्य- Chandrakantha.com)