MP Crime : देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेले मध्य प्रदेशातील इंदूर (Indore Crime) शहर सध्या गुन्हेगारांचा अड्डा बनत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंदूर शहरात शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. रात्री उशिरा दोन बाजूंमधील रक्तरंजित संघर्षामध्ये एका सुरक्षा रक्षकाने परवानाधारक बंदुकीने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन जण जागीच ठार झाले तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (MP Police) आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर शहरात घबराट पसरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूरच्या खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णा बाग कॉलनीत रात्री 11 वाजता एका बँक गार्डने दोघांची हत्या करुन दहशत निर्माण केली. कुत्र्याला फिरवण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाचा शेजाऱ्यांशी वाद झाला होता. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत अशलेल्या सुरक्षा रक्षकाने परवाना असलेल्या बंदुकीतून दणादण गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शेजारी राहणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील सहा जण जखमी झाले असून, यामध्ये दोन महिला गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. पोलिसांनी आरोपी राजपाल सिंगला अटक केली असून त्याच्याकडून परवाना असलेली बंदूक जप्त केली आहे.


नेमकं काय घडलं?


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त अमरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मृत राहुल (28) आणि विमल (35) नातेवाईक आहेत. विमलचे निपानिया येथे सलून असून आठ वर्षांपूर्वी राहुलची बहीण आरती हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. त्याला दोन मुली आहेत. राहुल लासुदिया परिसरात एका कार्यालयात काम करतो. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षक राजपाल कुत्र्याला फिरवत होता. त्याचवेळी दुसरा कुत्रा आला आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले. राहुलच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद वाढला. भांडण वाढल्याने राहुलच्या कुटुंबातील बाकीचे लोकही बाहेर आले. त्यानंतर संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने घराकडे धाव घेतली आणि बंदूक घेऊन तो पहिल्या मजल्यावर पोहोचला. तेथून त्याने राहुल, विमल यांच्या कुटुंबीयांवर गोळीबार केला. यामध्ये राहुल आणि विमल यांचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील सहाजण जखमी झाले."


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजता आरोपी राजपाल कुत्र्याला फिरवत होता. यादरम्यान दुसरा कुत्रा आला आणि दोन्ही कुत्र्यांची मारामारी सुरू झाली. यावेळी राहुलच्या कुटुंबाने आक्षेप घेतल्यावर वादावादी झाली. वाद वाढल्यावर आरोपी घराकडे धावला आणि बंदुक घेऊन पहिल्या मजल्यावर पोहोचला आणि गोळीबार सुरू केला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. राहुल आणि विमल यांना गंभीर अवस्थेत एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. ज्योती (30) पती राहुल, सीमा (36) पती सुखराम, कमल (50) वडील कडवा, मोहित (21) वडील भीम सिंग, ललित (40) वडील नारायण बोरसे आणि प्रमोद हे सर्व एमवायएचमध्ये दाखल आहेत.