बंगळुरू : 'इन्फोसिस'मध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यानंतर भारत सरकारच्या आधार प्रकल्पाचे प्रमुख नंदन नीलेकणी यांना कंपनीत परत आणण्यात आलंय. गुरुवारी रात्री त्यांनी कंपनीचे अ-कार्यकारी चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी कॉन्फरन्स कॉलद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.


कंपनीत फेरबदल


नीलेकणी यांना परत बोलावतानाच कंपनीत काही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. चेअरमन आर. शेषशायी आणि दोन स्वतंत्र संचालक पायउतार झाले आहेत. सह-चेअरमन रवी वेंकटेसन यांना स्वतंत्र संचालक करण्यात आले आहे.


नीलेकणी हे गुंतवणूकदार, संचालक मंडळ आणि संस्थापक या सर्वांनाच सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले. कंपनीच्या प्रशासनात सुधारणा करण्याचे मनसुबेही त्यांनी व्यक्त केले. 


इन्फोसिसची धोरणे आणि मिळकत यावर आताच काही बोलणे अपरिपक्वपणाचे होईल. इन्फोसिसमधील सर्वोच्च दर्जाच्या औद्योगिक व्यवस्थापनास आपण बांधील आहोत. कंपनीत कोणत्याही प्रकारे विसंवादी सूर निघू नये, यासाठी आपण प्रयत्न करू. ऐक्य निर्माण करण्यावरच आपला भर राहील. अ-कार्यकारी चेअरमन या नात्याने माझी भूमिका ही निगराणी करणे, व्यवस्थापन आणि परिचालन याबाबतीत लक्ष घालणे, तसेच नव्या सीईओच्या शोधात मदत करणे, या स्वरुपाची राहील, असं यावेळी निलकेणी यांनी म्हणटलंय.


नवा सीईओ हा इन्फोसिसमधला, बाहेरचा अथवा इन्फोसिसचा माजी सदस्य असू शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. कंपनीला गरज आहे, तोपर्यंत आपण या पदावर राहू, असेही त्यांनी सांगितले.