NDA Meeting: लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर झाले आहेत. भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, असे असले तरी भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षाची गरज भासणार आहे. आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे. या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे. राजनाथ सिंह यांनी याबाबत प्रस्ताव मांडला असून केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी याबाबत अनुमोदन केले. एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी  संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले. 


'एनडीए आज देशभरात 22 राज्यात लोकांनी सरकार बनवून सेवा करण्याची संधी दिली. सात राज्यांमध्ये एनडीए नागरिकांची सेवा करत आहेत. आपण सर्व-धर्म समभाव मानत असून सविधानाला समर्पित आहे. आज आपल्याला त्या राज्यांतही एनडीएच्या रुपात सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. प्री पोल अलायन्स हिंदुस्थानाच्या राजकारणाच्या इतिहासात तर, युतीच्या इतिहासात प्री पोल अलायन्स कधीच इतके यशस्वी झाले नसेल इतकं एनडीए झालं आहे, 'असं मोदी यांनी म्हटलं आहे. पुढच्या 10 वर्षात विकासाचा नवा आराखडा रचणार एनडीए सरकार देशाला प्रगतीपथावर नेणार. सुशासन म्हणजे एनडीए सरकार, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 


'सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे. पण देश चालवण्यासाठी सर्वमत खूप गरजेचे आहे. आज मी देशवासियांना हा विश्वास देऊ इच्छितो की आज तुम्ही आम्हाला बहुमत देऊन सरकार चालवण्याची संधी दिली आहे. तर आम्हा सर्वांची जबाबदारी आहे की आम्ही सर्वमताचा आदर ठेवून देशाला पुढे नेण्यासाठी आम्ही कोणतीच कसर बाकी ठेवणार नाही,' असं, मोदी म्हणाले आहेत.



'एनडीएच्या अस्तित्वाला 30 वर्षे झाली आहेत. देशात यापूर्वी कधीही निवडणूकपूर्व आघाडीला एवढा मोठा विजय मिळाला नव्हता. एनडीए आघाडीची ही चौथी टर्म आहे. ही भारताची सर्वात यशस्वी युती आहे. ही मूल्ये जनतेच्या सेवेसाठी आम्हाला मिळाली आहेत. एनडीएला अटलबिहारी वाजपेयींशिवाय बाळासाहेब ठाकरे, प्रकाशसिंग बादल यांसारख्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. आज एनडीएचा वटवृक्ष झाला आहे. अशा परिस्थितीत आपण लोकांच्या स्वप्नांवर खरे उतरू,' असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. 


'एनडीए सरकार येत्या 10 वर्षात विकासाचा नवा आराखडा तयार करेल, नागरिकांचे जीवनमान सुधारू. हे माझे स्वतःचे मोठे स्वप्न आहे. जेव्हा मी लोकशाहीच्या समृद्धीचा विचार करतो तेव्हा मला वाटते की सामान्य माणसाच्या, विशेषतः मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप जितका कमी होईल तितकी लोकशाही अधिक मजबूत होईल. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण हे अगदी सहज करू शकतो. आम्हालाही बदल हवा आहे,' असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.


मोदींचा विरोधकांना टोला


काँग्रेसला 100 चा आकडा पार करता आला नाही. ही सलग तिसरी अशी वेळ आहे. त्यात विरोधकांनी निवडणुकीच्या काळात चक्क निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टात नेलं. देशात आणि परदेशात सुद्धा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. भारताच्या लोकशाही टीका केली. INDIA आघाडीत मागच्या शतकातले लोक आहेत असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.