नवी दिल्ली : जगभरातील जवळपास १८० हून जास्त राष्ट्रांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. अतिशय झपाट्यानं वाढणाऱ्या या विषाणूच्या संक्रमणामुळं जवळपास २.३४ कोटी जण अनेक अडचणींचा सामना करत आहेत. तर, ८.०८ लाखांहून जास्त कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना बाधित आणि मृतांची आकडेवारी वाढत असतानाच भारतामध्येही दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतातील केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला देशातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 31,06,348 वर पोहोचला आहे.

जवळपास 207 दिवसांमध्ये देशातील कोरोना रुग्णांनी 31 लाखांचा आकडा ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये देशात 61,408 जणांना नव्यानं कोरोनाची लागण झाली आहे. तर, 836 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात एकिकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच दुसरीकडे या विषाणूच्या संसर्गावर मात करणाऱ्यांची संख्याही काही अंशी वाढताना दिसत आहे.

आतापर्यंत एकूण 23,38,035 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर, देशात 57,542 जणांना कोविड संसर्गामुळं प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या बाबतीत रिकव्हरी रेटही दिवसागणिक सुधारताना दिसत आहे. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ७५.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रत्येक राज्यानं राबवलेल्या काही महत्त्वाच्या उपक्रम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळं जवळपास सर्वच राज्यांतून कोरोना रुग्ण समोर येत आहेत. ज्यांच्यावर विविध स्तरांवर उपचारही सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली.