पाटणा : बिहारच्या हाजीपूरजवळ सीमांचल एक्स्प्रेसचे ९ डबे रुळावरून घसरून सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटने झाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे.  या रेल्वे दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. बिहारच्या जोगबनी इथून दिल्लीकडे ही रेल्वे येत होती. त्याचवेळी सहदाई बुजुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुर्घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. सोनपूर आणि बरौनी इथून घटनास्थळावर आरोग्य पथकही दाखल झाले आहेत. या रेल्वे दुर्घटनेचं कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाही. भारतीय रेल्वेकडून दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी काही दुरध्वनीक्रमांक देत मदतीचा ओघही सुरू करण्यात आला आहे. 


दुर्घटनेचं भीषण स्वरुप लक्षात घेत त्याठिकाणी एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता रेल्वे डब्यांखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम वेगाने सुरु करण्यात आलं आहे. प्राथमिक पातळीवर सावधगिरी बाळगत दुर्घटनाग्रस्तांना घटनास्थळापासून रुग्णालयात नेण्याचं काम सुरु आहे. या दुर्घटनेची छायाचित्रं आणि व्हिडिओ पातचा त्याचं भीषण स्वरूप लक्षात येत आहे. हा अपघात नेमका का झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट असून, त्याप्रकरणी कारवाई करण्यात येण्याची मागणी करण्यात येत आहे.





दरम्यान, या दुर्घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुर्घटनेबद्दल निराशा व्यक्त करत गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाण्याचे आदेश संबंधीत कार्यकारिणीला दिले आहेत. बचावपथकांकडून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपये तर गंभीररित्या जखमी झालेल्यांना १ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. किरकोळ जखमींना ५० हजार रूपयांची मदतही रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.