पटना : नितीशकुमार यांनी आज पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काल रात्री उशिरा नितीशकुमारांनी बिहारच्या राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. आमच्याकडे 132 आमदारांचं पाठबळ असल्याचा दावा भाजपच्या सुशील मोदींनी केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीश कुमारांच्या नव्या सरकारचा आज सकाळी दहा वाजता शपथविधी झाला. नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपनं नितीश कुमारांना पाठींबा दिला. त्यामुळे भाजपची बिहारच्या सत्तेत पुन्हा एन्ट्री झाली. दरम्यान बुधवारी बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला.


नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जेडीयू विधिमंडळ दलाच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. सध्याच्या वातावरणात सरकार चालवणं कठीण झाल्याचं सांगत नितीश कुमार यांनी राजीनामा सोपवला होता. आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. मात्र कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्यानं आपली घुसमट होत असल्याचं नितीश यांनी सांगितलं होतं. संकट आल्याचं सांगत लालू यांनी संरक्षण मागितलं. मात्र हे ओढवून घेतलेलं संकट असल्यामुळं संरक्षणाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं सांगत नितीश यांनी लालूंवरील आरोपांना पुष्टी दिली.