मुंबई : बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये फूट पडली आहे. महाआघाडीतून नितीशकुमार मुख्यमंत्री होण्याची अधिकृत घोषणा निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही आणि दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) कॅम्पमध्ये मंत्रिपदावरून गदारोळ सुरू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधीपक्ष नेते आता उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला त्याचप्रमाणे बिहारमध्ये ही राजकीय भूकंप होतोय. देवेंद्र फडणवीस विरोधीपक्ष नेते पदावरून उपमुख्यमंत्री झाले. त्याच प्रमाणे तेजस्वी यादव हे देखील उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. 


गृहखात्यावर दावा 


सूत्रांच्या माहितीनुसार तेजस्वी यादव यांना नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारमध्ये गृह खाते हवे आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही पुत्रांना नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये मंत्री केले जाऊ शकते.


सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन सरकार स्थापनेची अधिकृत घोषणा करण्याची केवळ औपचारिकता उरली आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारमध्ये तेजस्वी यादव मंत्री होणार हे निश्चित, लालू प्रसाद यांचे थोरले पुत्र तेज प्रताप यादव यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.


जेडीयू संसदीय पक्षाची आज पाटणा येथे बैठक होणार आहे, तर दुसरीकडे आरजेडीच्या छावणीतही बैठकांची फेरी सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. नितीश कुमार दुपारी चारच्या सुमारास राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, असे बोलले जात आहे.


गेल्या वेळी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांना मंत्री करण्यात आले होते. मात्र, नंतर नितीशकुमार यांनी महाआघाडीपासून दूर राहून भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले.