वाराणसी : गुजरातमधून उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांना हुसकावून लावण्यात आल्याच्या घटनांचे आता उत्तर प्रदेशात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातच 'गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो' अशा आशयाची पोस्टर सर्वत्र लावण्यात आली आहेत.


गुजरातींनी शहर सोडण्याचा इशारा 


वाराणसीत राहणाऱ्या गुजरातींनी शहर सोडून जावं, असा इशारा यूपी-बिहार एकता मंच या संघटनेनं दिला आहे. हातात फलक घेऊन मंचच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार निदर्शनं केली. एवढंच नव्हे तर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजीही केली. गुजराती व्यक्तीला आम्ही निवडून दिलं. पण त्यांच्या गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहेत. त्यांना पिटाळून लावलं जातंय. हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.