गोरखपूर : शेतकऱ्यांसाठी बहुप्रतिक्षित 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना' आजपासून सुरू केली जाणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये २ हजार रूपये दिले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने'ची सुरूवात करणार आहे. याअंतर्गत देशातील एक करोडहून अधिक लहान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन हजार रूपयांची पहिली रक्कम टाकण्यात येणार आहे. कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने २०१९-२० या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत जमिन असणाऱ्या १२ कोटी लहान शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रूपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरूवात गोरखपूर येथून होत आहे. या योजनेमुळे मेहनत करणाऱ्या, आपले पोषण करणाऱ्या करोडो भारतीय शेतकऱ्यांच्या पंखांना बळ मिळणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. १ फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर योजना इतक्या कमी वेळेत अमलात आणली जात आहे. ही नवीन भारताची नवीन कार्यसंस्कृती असल्याचेही मोदींनी सांगितले. ही योजना याच आर्थिक वर्षापासून सुरू होणार असून शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत दोन हजार रूपयांची पहिली रक्कम मिळणार आहे. 





शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा योग्य तो भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शनिवारी लहान शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी देण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याचे सांगितले. उत्तरप्रदेश तसेच कर्नाटकसह १४ राज्यांत एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना रविवारी दोन हजार रूपये दिले जाणर आहेत. त्याशिवाय २८ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील शेतकऱ्यांना पुढील दोन ते तीन दिवसांत रक्कम पाठवली जाणार आहे.