नवी दिल्ली: पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी PM Narendra Modi यांनी गेल्या एक वर्षात आपल्या सरकारने काय काम केले, याचा हिशेब लोकांसमोर मांडला आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे, राम मंदिराचा निर्णय, तिहेरी तलाकच्या कुप्रथेला चाप लावणे आमि नागरिकत्त्व सुधारणा कायदा (CAA) अशा ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख मोदींनी या पत्रात केला आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण २०१९ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे आणि भारताला महासत्ता करण्याचे स्वप्न नागरिकांना दाखवले होते. गेल्या वर्षभरात घेतलेल्या निर्णयांमुळे आपण त्या लक्ष्याच्या समीप पोहोचल्याचे मोदींनी पत्रात म्हटले आहे. 

याशिवाय, भारताने सर्जिकल स्ट्राईक करून आपले सामर्थ्य दाखवून दिले. तसेच वन रँक वन पेन्शन, वस्तू व सेवा कर कायदा (GST) आणि शेतकऱ्यांना किमान हमीभाव यासारखे बऱ्याच वर्षांपासून खितपत पडलेले प्रश्न मार्गी लावले. हे प्रयत्न निरंतर सुरु ठेवण्यासाठी जनतेने २०१९ मध्ये जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले. आज देशातील १३० कोटी जनता स्वत:ला या विकाकगाथेची भागीदार मानत असल्याचे मोदींनी या पत्रात म्हटले आहे. 


संरक्षण दल प्रमुख हे पद निर्माण केल्यामुळे सैन्य दलात समन्वय वाढला आहे तसेच ‘गगनयान’ अभियानाच्या तयारीसाठीसुद्धा भारताने वेग वाढवला आहे. गरीब, शेतकरी,  महिला-युवा यांचे सक्षमीकरण करण्याला सरकारने प्राधान्य दिले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षभरात या योजनेअंतर्गत साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या  खात्यात ७२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी पत्रात सांगितले आहे.