नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निकाल पाहून खचून जाऊ नका. आपली मेहनत वाया जाणार नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी नक्की चांगली असेल, असा विश्वास काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्वांचलच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर रविवारी प्रसारमाध्यमे आणि विविध संस्थांकडून मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल जाहीर करण्यात आले होते. यापैकी बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येईल, असे भाकीत वर्तवले होते.


मात्र, प्रियंका यांनी कार्यकर्त्यांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. त्याऐवजी ईव्हीएम यंत्रे असलेल्या स्ट्राँग रूमवर अधिक कडक पहारा ठेवावा. मला विश्वास आहे की, आपण निवडणुकीसाठी घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. काँग्रेस पक्ष नक्कीच चांगली कामगिरी करेल, असे प्रियंका यांनी म्हटले. 


अनेक एक्झिट पोलनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) बहुमतासाठी लागणाऱ्या २७२ नव्हे तर ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. काही एक्झिट पोलनी तर भाजपला २०१४ प्रमाणे कोणाचीही मदत न घेता एकहाती सत्ता मिळेल, असेही म्हटले आहे. तर संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) किमान ११७ ते कमाल १६४ जागा मिळू शकतात. त्यामुळे देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


त्यामुळे भाजपच्या गोटात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तसेच अमित शहांकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील ( रालोआ) नेत्यांना सहभोजनाचे निमंत्रणही देण्यात आले आहे. 


तर दुसरीकडे एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे विरोधकांच्या गोटात मात्र शांतता पसरली आहे. भाजपप्रणित एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. परिणामी यंदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा दावा विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी केला जात होता. मात्र, एक्झिट पोलच्या आकडेवारीने विरोधकांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे. यानंतर विरोधकांनी तुर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून सर्वजण २३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे डोळे लावून बसले आहेत.