नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागल्यानंतर पार्टी अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर अडून बसले आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी पार्टीचे ज्येष्ठ नेते राहुल यांच्याकडे गेले पण आजही कोणता निर्णय झाला नाही. राहुल गांधी आपल्या निर्णयावर कायम असून एका महिन्याच्या आत माझ्याजागी पर्याय शोधा असे त्यांनी सांगितले आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी याबद्दल माहिती दिली. राहुल यांच्या भुमिकेवर कॉंग्रेस पार्टी देखील बघ्याच्या भूमिकेत आहे. राहुल गांधींची मनधरणी करता येईल असे आताही काँग्रेस पार्टीला वाटत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉंग्रेस पार्टीवर परिवार वादाचा झालेला आरोप पाहता प्रियंका गांधी यांना या निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवले जाईल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सध्या तरी पार्टीच्या रचनेत कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पण आपल्या सत्ताधारी राज्यांमध्ये कॉंग्रेस काही महत्त्वाचे बदल करु शकते असे सांगण्यात येत आहे. 


लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा फेटाळला गेला असला तरी त्यांचा विचार बदललेला नाही. गांधी घराण्याव्यतिरिक्त दुसऱ्या ज्येष्ठ नेत्याची अध्यक्षपदी निवड पक्षाला करावी लागणार आहे. एकीकडे पक्ष संघटनेत व्यापक बदल करत असताना दोन राज्यांमधली सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर आहे. या दोन्ही राज्यांत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पुरतं पानिपत झालंय. 



मध्य प्रदेशात ११४ आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्या खालोखाल भाजपाचे १०९ आमदार आहेत. चार अपक्ष, दोन बसपा आणि एक सपा आमदारानं सध्या काँग्रेस सरकारला पाठिंबा दिलाय. मध्य प्रदेशमध्ये बहुमताचा आकडा ११६ असल्यानं यातल्या किमान दोघांचा पाठिंबा कमलनाथ यांच्यासाठी आवश्यक आहे. दुसरीकडे काँग्रेसचेच काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी रविवारी रात्री पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. यावेळी सर्व आमदारांनी आपण सोबत असल्याची हमी कमलनाथ यांना दिल्याचा दावा गृहमंत्री बाला बच्चन यांनी केला.