मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान काँग्रेसमध्ये मोठे बदल होऊ शकतात. सचिन पायलट आणि सोनिया गांधी यांची गुरुवारी बैठक झाली, त्यात राज्य पातळीवर पक्षात बदल केले जाऊ शकतात, असे संकेत मिळाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तक्रारींवर गठीत समितीच्या कामावर चर्चा


राजस्थान काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट गुरुवारी 10, जनपथ येथे पोहोचले आणि त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या तक्रारींवर स्थापन केलेल्या समितीच्या कामावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.


भेटीनंतर काय म्हणाले सचिन पायलट?


काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर सचिन पायलट म्हणाले, 'केंद्राकडून ज्या प्रकारची दडपशाहीची धोरणे अवलंबली जात आहेत, त्या पाहता राजस्थानमध्ये कोणती राजकीय रणनीती अवलंबली पाहिजे याबद्दल मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना माझा अभिप्राय दिला.'


पक्षातील आपल्या भूमिकेबाबत सचिन पायलट म्हणाले, 'पक्ष जी काही जबाबदारी देईल ती पूर्ण करण्यास मी तयार आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी यापूर्वीही पार पाडली आहे. राजस्थान हे माझे गृहराज्य असले तरी माझ्यावर जी काही जबाबदारी असेल ती मी पूर्ण करेन आणि एकत्र येऊन राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार पुन्हा एकदा आणू.


ते पुढे म्हणाले की, राजस्थानमध्ये गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आम्ही खंडित करू. जर आपण संघटित पद्धतीने काम केले तर राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा सरकार स्थापन करू शकतो. राजस्थानबाबत दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या समितीत जे काही घडले, त्याबाबत चर्चा झाली. या संदर्भात मी काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतली. सर्वसामान्यांचा आवाज कसा बळकट करता येईल यावर चर्चा झाली. संघटनांच्या निवडणुकाही होणार आहेत.


याआधी बुधवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, त्यानंतर गुरुवारी काँग्रेस अध्यक्षांनी सचिन पायलट यांना बोलावून चर्चा केली होती.