नवी दिल्ली : खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, (Pragya Thakur) या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहतात, त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत  (Ministry of Defence) स्थान देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेत्या (BJP) आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळमधील  (Bhopal) खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सदस्य केले गेले आहे.  मालेगाव स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर या आरोपी आहेत. त्या जामिनावर बाहेर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कमिटीचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे करीत आहेत. सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव करीत  विजय मिळवला होता. संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. यात प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. 



संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या (Ministry of Defence) अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून त्या चर्चेत आहेत. 


साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची वादग्रस्त वक्तव्य


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर जादूटोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केली होती.  दरम्यान,  त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रत्येकवेळी भाजपकडून स्पष्टीकरण दिले गेले आहे. तसेच भाजपकडून त्यांना तंबीही देण्यात आली होती. मात्र, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याचे टाळलेले नाही.  साध्वी यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गोडसेला देशभक्त म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत चांगलाच गदारोळ केला होता. या वादाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. 



या वादावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, साध्वी प्रज्ञांना मी मनातून कधीच माफ करणार नाही. त्यानंतर भाजपने साध्वींना या वक्तव्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८ मधील मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी आहे. तसेच त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे.