नवी दिल्ली: सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेने राजस्थानमध्ये निर्माण झालेला पेचप्रसंग सोडवण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आता सूत्रे हातात घेतली आहेत. एकीकडे सचिन पायलट दिल्लीत बसून आमदारांची जमवाजमव करत असताना सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या तीन नेत्यांना जयपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता अजय माकन, रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे हे जयपूरमध्ये जाऊन ग्राऊंड लेव्हलवरील परिस्थिती हाताळणार आहेत. हे तीन नेते काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा करतील. अजय माकन, रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे आज रविवारी रात्रीच जयपूरला रवाना होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Rajasthan crisis: सचिन पायलटांनी राहुल गांधींची भेट टाळली; काँग्रेसचे सरकार पडणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे ३० आमदार आणि काही अपक्ष सचिन पायलट यांच्या संपर्कात आहेत. हे आमदार सचिन पायलट यांच्यासोबत भाजपमध्ये गेल्यास राजस्थानमधील काँग्रेस सरकारच अडचणीत येऊ शकते. त्यामुळे आता अजय माकन, रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे या नाराज आमदारांशी चर्चा करुन त्यांचे मन वळवू शकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत CM Gehlot यांनी आज रात्री काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आता किती आमदार उपस्थित राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


सचिन पायलट यांच्यासाठी ज्योतिरादित्य सिंधियांचं ट्विट, म्हणाले...


तर दुसरीकडे भाजपकडून मात्र अत्यंत सावधपणे पावले टाकली जात आहेत. सचिन पायलट दिल्लीत असूनही भाजपच्या गोटातून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप संपूर्ण बोलणी पूर्ण होईपर्यंत याबाबत गुप्तता पाळेल, असे दिसत आहे.