मुंबई  : अनेक विद्यार्थी हे पदवी शिक्षणानंतर किंवा त्याआधी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करतात. सनदी अधिकारी होण्याचं या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. मात्र या स्पर्धा परीक्षेचा निकाल हा काही टक्के इतका लागतो. देशातून अनेक लाखो विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा देतात. मात्र त्यातून अवघे काही शे उमेदवारांचंच अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. कठोर परीश्रम, सातत्य आण चिकाटी जोरावर हे ध्येय पूर्ण होतं. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी हे मानसिकरित्या मजबूत असायला हवेत. (success story of ias ritika jindal who passed upsc exam in 2nd attempt with 88 rank who father diagnosed with cancer during to exam preparation)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मन शांत असेलं आणि त्यांच्यावर दडपण नसेल तर त्यांचं अभ्यासात लक्ष लागतं. परिणामी याचा चांगला परिणाम हा निकालात दिसून येतो. मात्र सर्वच विद्यार्थ्यांची परिस्थिती ही अनुकूल असतेच असं नाही.


काही विद्यार्थ्यांची कौटुंबिक स्थिती ही हलाखीची असते. तर काहींना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. मात्र न खचता हे विद्यार्थी सर्व समस्यांचा सामना करत आपलं स्वप्न पूर्ण करतात. अशीच काही गोष्ट आहे पंजाबमध्ये राहणारी (Ritika Jindal) रितिका जिंदलची. रितीकाने सर्व अडचणींनींवर मात करत यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होत सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न केलं. रितीकाने 88 वा क्रमांक (रँक) पटकावला.


लहाणपणापासून सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न


रितीकाचं लहानपणापासून सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. रितीका म्हणते की मी पंजाबमधील आहे. पंजाबमधील मुलं लाला लजपतराय आणि भगत सिंह यांच्या शौर्यगाथा ऐकून मोठे होतोत. याचप्रमाणे रितीकाही अशाच स्वांतत्र्य सैनिकांच्या गोष्टी ऐकून मोठी झाली. त्यामुळे तिला देशासाठी काही तरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे रितीकाने यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला.


बारावीत टॉपर


पंजाबमध्ये जन्मलेल्या रितीकाचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मोग्यात झालं. रितीका अभ्यासात  लहानपणापासूनच हुशार होती. रितीकाने 12 वी च्या परीक्षेत सीबीएसई बोर्डातून उत्तर भारतातून पहिला क्रमांक पटकावला होता. रितीकाने पदवी शिक्षण हे कॉमर्स शाखेतून 95 टक्क्यांसह पूर्ण केलं. विशेष म्हणजे तेव्हा रितीका महाविद्यालयातून तिसरी आली होती.


पहिल्या संधीत अपयशी 


डीएनएच्या रिपोर्टनुसार, रितीकाने पदवी शिक्षणादरम्यान स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरु केली होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच रितीकाने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेतील पहिले 3 टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले. मात्र अंतिम टप्प्यात काही गुणांमुळे तिचं स्वप्न अधूरं राहिलं. मात्र ती खचली नाही. तिने आणखी जोमाने अभ्यास केला.


वयाच्या 22 वर्षी सनदी अधिकारी
 
रितीकाने 2018 मध्ये दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात अपयशी झाल्याचं शल्य रितीकाच्या मनात होतं. त्यामुळे रितीकाने दुसऱ्या प्रयत्नात कोणतीही उणीव ठेवली नाही. रितीकाने घेतलेल्या मेहनतीचं तिला फळ मिळालं. रितीकाने दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. तिने तिचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण केलं. रितीका 22 व्या वर्षी सनदी अधिकारी झाली.


परीक्षेदरम्यान वडिलांना कॅन्सरचं निदान


रितीकाचा सनदी अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. रितीका जेव्हा पहिल्यांदा यूपीएससी परीक्षेचा अभ्यासाची तयारी करत होती, त्यावेळेस तिच्या वडिलांना तोंडाचा कर्करोग झाला होता. याचा थेट परिणाम हा रितीकाच्या अभ्यासावर झाला. दुसऱ्यांदा जेव्हा यूपीएससी परीक्षेच्या तयारीत होती, तेव्हा फुप्फुसांचा कॅन्सर झाला. रितीकाचा परीक्षा पाहणारा हा काळ होता. मात्र तिने न खचता आणखी जोमाने अभ्यास केला.
 
वडिलांची सुश्रूषा आणि अभ्यास


रितीका परीक्षेची तयारी करत असताना वडिलांकडे लक्ष देत होती. "मी एका छोट्या शहरातली आहे, जिथे मोजक्याच सोयीसुविधा आहेत. जेव्हा जेव्हा वडिलांची प्रकृती बिघडायची तेव्हा त्यांना उपचारासाठी लुधियानाला जावं लागायचं. वडिलांनी आजारावर मात केली. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली", अशी प्रतिक्रिया रितीकाने एका मुलाखतीदरम्यान दिली होती.