नवी दिल्ली : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याविरोधात बाबरी मशीद पाडल्याप्रकरणीचा खटला एप्रिल २०१९ आधी कसा निकाली काढणार याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयानं मागवला आहे. न्यायमूर्ती आर एफ नरिमन आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठानं उत्तरप्रदेशातील सत्र न्यायालायाचे न्यायाधीश एस के यादव यांना हा अहवाल बंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


गेल्या वर्षी १९ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयानं दोन वर्षात खटला संपवण्याचे आदेश दिले होते. याच आदेशात न्यायाधीशाची बदली न करता, सलग दोन वर्षात खटला संपवण्याचे निर्देश दिले होते. त्याची प्रगती आता अहवालाद्वारे सादर करण्याचे आदेश खंडपीठानं सोमवारी दिले आहेत.