नवी दिल्ली: खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मराठा आंदोलनातील बहुतांश मोर्चे हे शांततापूर्ण पद्धतीने पार पडले. मात्र, शेवटच्या टप्प्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गोष्ट घडायला नको पाहिजे होती. त्यावेळी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, या सगळ्यांनी दंगल नव्हे तर आंदोलन केले होते. हे आंदोलन वैयक्तिक अजेंड्यासाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी होते. त्यामुळे या मराठा आंदोलनातील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. 


'भीमा कोरेगावप्रकरणी संभाजी भिडे यांची चौकशी करा'


तसेच शिवाजी महाराजांच्या एकेरी नावाचा उल्लेख टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. मी या दोघांनाही समज दिली होती. यावर दोघांनीही दिलगिरीही व्यक्त केली. 


'छत्रपतींच्या नावाची शपथ घेणे गुन्हा असेल तर मी प्रत्येक जन्मात करेन'


मात्र, असे प्रकार सातत्याने घडत राहिले तर ते चुकीचे ठरेल. त्यामुळे आपण महाराष्ट्रातूनच या गोष्टी टाळण्यासाठी सुरुवात करू. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ किंवा शिवाजी नगर यासारख्या सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार करावा. शिवाजी नावापुढे महाराज ही उपाधी लावावी. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज नगर असा उल्लेख केला जाईल. त्यामुळे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टळेल, असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले.