Honour Killing :  देशाला हादरवणारी आणखी एक ऑनर किलिंगची घटना घडली असून, यावेळी आई- वडिलांनी पोटच्या मुलीला तिनं अनुसूचित जमातीतील तरुणाला जोडीदार म्हणून निवडल्याचा आकस मानात ठेवत सूडभावनेनं तिला संपवण्याचं क्रूर कृत्य केलं. 


कुठे घडली नात्यांला काळीमा फासणारी घटना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूतील तंजावर येथे अनुसूचित जातींमधील मुलाशी लग्न केलं म्हणून आईवडिलांनीच पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली. बीबीसीच्या वृत्तानुसार पूवालूर गावातील नवीन नावाच्या तरुणानं नजीकच्या गावातील 19 वर्षीय ऐश्वर्याशी लग्न केलं होतं. पाच वर्षांच्या प्रेमाच्या नात्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तिरुप्पूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या ऐश्वर्या आणि नवीन यांनी 31 डिसेंबरला लग्न केलं आणि नवा प्रवास सुरु केला.


त्यांचा हा निर्णय मात्र फार काळासाठी त्यांनी सुख देऊ शकला नाही. कारण, त्यांचं हे लग्न ऐश्वर्याच्या घरी मान्य नव्हतं. सातत्यानं त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ऐश्वर्याच्या कुटुंबीयांनी काही नातेवाईकांसमवेत तिरुप्पूर जिल्ह्यात असणाऱ्या पल्लडम पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. ज्यानंतर पोलिसांनी ऐश्वर्याला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं. 


नवीनच्या कानी ही बाब जाताच त्यानं 7 जानेवारीला वाट्टाथिकोट्टाई पोलीस स्थानकात तक्रार दाखल करत आपण एससी प्रवर्गातील असून ऐश्वर्या ओबीबी प्रवर्गातील असल्याचं सांगितलं. 2 जानेवारी रोजी नेमकं काय घडलं, ऐश्वर्याच्या कुटुंबीयांनी तिला कसं घरी नेलं हा घटनाक्रम त्यानं पोलिसांना सांगितला. धक्कादायक बाब म्हणजे ऐश्वर्याला कुटुंबीयांनी 3 जानेवारीला जीवानिशी मारत तिच्या मृतदेहावर अंत्यविधी केल्याचा खळबळजनक दावा नवीननं या एफआयआरमध्ये केला होता. 


ऐश्वर्याचा करुण अंत... 


नवीनच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेतली आणि अतिशय वेगानं तपास सुरु झाला. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार ऐश्वर्याच्या आईवडिलांनीच नेयवावीदुधी या गावात चिंचेच्या झाडाला फास देत तिची हत्या केली. बीबीसीनं प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ऐश्वर्याला तिच्या वडिलांनी बळजबरीनं चिंचेच्या झाडापाशी नेलं आणि तिथं तिला अतिशय क्रूरपणे संपवलं. 


जिल्हा पोलीस अधीक्षक आशिष रावत यांच्या माहितीनुसार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ऐश्वर्याचे वडील पेरुमल आणि आई रोजा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात या क्रूर कृत्याचा उलगडा केला. 2 जानेवारीला पोलीस स्थानकातून परतल्यानतंर लगेचच त्यांनी ऐश्वर्याला फासावर लटकवलं होतं. माफी माग आणि फाशी घे... असं म्हणत त्यांनी हे पाऊल उचललं आणि फासाचा दोर तुटूनही ऐश्वर्या हयात असल्याचं लक्षात येताच तिला गळा दाबून पेरुमलने तिची हत्या केली. 


हेसुद्धा वाचा : कर्नाटकात LIVE 'सैराट'; 6 मुस्लिम तरुणांची रुममध्ये घुसून आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण; फरफटत रस्त्यावर आणलं अन्...


दरम्यान, पायाखालची जमीन हादरवणाऱ्या या कृत्यामध्ये ऐश्वर्याच्या आई-वडिलांना कोणीमदत केली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.  


पुन्हा सोशल मीडियानंच केला घात? 


उपलब्ध माहितीनुसार नवीन- ऐश्वर्याच्या लग्नाचा व्हिडीओ या दोन्ही गावांमधील नागरिकांमध्ये व्हायरल झाला. सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं तणावात आणखी भर टाकली. दोन समाजांमध्ये असणारा भेदभाव गंभीर वळणावर पोहोचला, असं आता पूवालूरमधील नागरिक म्हणताना दिसत आहेत. 


या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. एकिकडून ऐश्वर्याचा तिच्या मनाविरुद्ध पोलीस स्थानकात नेण्यात आलं जिथं तिला धमकावण्यात आलं. तर, पल्लडमचे डीएसपी विजयकुमार यांच्या माहितीनुसार मात्र ऐश्वर्या तिच्या मर्जीनंच आईवडिलांसोबत गेली होती. सदर प्रकरणी विवाहित मुलीला तिच्या माहेरी पाठवल्यानंतर पालकांकडून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या होण्याच्या या धक्कादायक घटनेनंतर पल्लडम पोलीस स्थानकात निरीक्षकपदी सेवेत असणाऱ्या मुरुगायह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.