नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच, ट्रेनला उशिर झाल्यामुळे प्रवाशांना नुकसान भरपाई मिळणार आहे. शनिवारी नवी दिल्ली लखनऊ तेजस एक्सप्रेस सव्वा तीन तास उशिरा दिल्लीत पोहचली. रेल्वेकडून आयआरसीटीसी ही ट्रेन चालवते. तसेच ही देशातील पहिली खासगी ट्रेन आहे. नियमांनुसार, या ट्रेनला १ तास उशिर झाल्यास १०० रुपये आणि २ तासांहून अधिक उशिर झाल्यास २५० रुपये नुकसान भरपाई आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी लखनऊ ते दिल्ली जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये ४५१ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना २५० रुपयांची नुकसान भरपाई मिळणार असल्याची महिती मिळत आहे.


शनिवारी सकाळी लखनऊ रेल्वे स्थानकांत कृषक एक्सप्रेसचे दोन डब्बे रुळावरुन घसरल्याने तेजस एक्सप्रेस सव्वा तीन तास उशिरा धावत होती.


सर्व प्रवाशांना याबाबत मेसेज पाठवण्यात आला आहे. त्यात पाठवण्यात आलेल्या लिंकच्या आधारे प्रवासी आपल्या नुकसान भरपाईचा दावा करु शकत असल्याचं आयआरसीटीसीने सांगितलं आहे. 


या ट्रेनमध्ये प्रत्येक प्रवाशाचा विमा काढण्यात येतो. याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून देण्यात येते.