मुंबई : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच (ICMR) आणि इम्पीरियल कॉलेज लंडनच्या डॉक्टरांनी तसंच संशोधकांनी मिळून एक अभ्यास केला आहे. या अभ्यासात दावा केला प्रमाणे, भारतात जरी कोरोनाची तिसरी लाट आली तरी तिची गंभीरता दुसर्‍या लाटे इतकी नसेल. हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"प्लाजबिलिटी ऑफ अ थर्ड वेव ऑफ कोविड-19 इन इंडिया: अ मेथेमेटिकल मॉडलिंग बेस्ड एनालिसिस" या नावाने हा अभ्यास प्रसिद्ध आहे. यामध्ये आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव, संदीप मंडल, समीरन पांडा आणि  इम्पीरियल कॉलेज लंडममध्ये कार्यरत असणारे निमलन एरिनामिंपथी यांचा समावेश आहे. कोरोनाची तिसरी लाट कोणत्या कारणांमुळे येऊ शकते याचा विचार या अभ्यासात करण्यात आला.


या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी लोकांना लस देण्यात आली आहे. लसीकरण संसर्गाची तीव्रता 60 टक्क्यांनी कमी करते. पुढील काही दिवसांत भारतातील मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण लक्षात घेता, तिसरी लाट तितकी प्रबळ नसण्याची शक्यता आहे.


दरम्यान या अभ्यासामध्ये असं म्हटलं आहे की, कोणत्याही परिस्थितीत संभाव्य तिसरी लाट ही दुसर्‍या लाटेपेक्षा मोठी असणं अपेक्षित नाही. अहवालात असा निष्कर्ष देखील काढला गेला आहे की, जर लसीकरणाची गती वेगवान राहिली तर तिसऱ्या लाटेच्या कारणं सौम्य होऊ शकतात. 


एकंदरीत कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने राबवल्यास तसंच लॉकडाऊनसारख्या उपायांमुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत मिळणार असल्यास आयसीएमारचं म्हणणं आहे. डेल्टा प्लसचा धोका वाढतोय. डेल्टा प्लसचे विषाणू अनेक राज्यात आढळत आहेत, अशा काळात आयसीएमआरचा निष्कर्ष भुवया उंचावणारा आहे.