नवी दिल्ली: आपण कोरोनाच्या प्रादुर्भावाला जितक्या लवकर आळा घालू तेवढ्या लवकर आपल्याला अर्थव्यवस्था रुळावर आणता येईल. कोरोनाला लवकर रोखले तर बाजार, कार्यालये आणि वाहतुकीची साधने सुरु करता येतील. त्यामुळे पुन्हा रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींनी मंगळवारी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, आपण वेळेवर निर्णय घेतल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश आले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अनलॉक-१ होऊनही दोन आठवडे उलटले आहेत. या काळात आपल्याला आलेले अनुभव भविष्यात उपयोगी ठरतील. आज मला तुमच्याकडून जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती समजली. तुम्ही दिलेल्या सूचना पुढील रणनीती ठरवण्यासाठी उपयोगी पडतील, असे नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 

गेल्या काही दिवसांमध्ये परदेशातून मोठ्याप्रमाणवर भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आले. तर हजारो मजूर आपापल्या गावी परतले. सध्या आपण वाहतुकीची बहुतांश साधने सुरु केली आहेत. मात्र, तरीही जगाच्या इतर भागांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा तितकासा प्रभाव जाणवत नाही, असे मोदींनी यावेळी म्हटले.

देशात कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे. आमच्यासाठी एकाही भारतीयाचा मृत्यू दुर्दैवी बाब आहे. मात्र, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर खूपच कमी आहे. मात्र, सध्या नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क न लावण्याचा विचारही करू नये. सुरक्षित अंतर, हात धुणे आणि सॅनिटायझर्सचा वापर अत्यंत गरजेचा आहे. जेव्हा भविष्यात भारताने कोरोनाशी कशाप्रकारे लढा दिला याचे विश्लेषण केले जाईल तेव्हा आपण कशाप्रकारे एकत्र मिळून काम केले, हे जगाला दिसून येईल, असेही मोदींनी यावेळी सांगितले.