भोपाळ : मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झालेत. वऱ्हाडाने खच्चून भरलेला हा ट्रक थेट पुलावरुन नदीत कोसळला. अजूनही या ट्रकमध्ये अनेकजण अडकून पडलेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येती आहे.


  ट्रक ६० ते ७० फूट नदीपात्रात कोसळला. जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. हे वऱ्हाड सिंगरौली जिल्ह्यातून सीधीच्या दिशेने चालले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.