Dwarkadhish Temple Hosted Two Flag: अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ (Tropical Cyclone Biparjoy) गुजरातच्या दिशेने सरकले आहे. गुजरातमधील समुद्रकिनाऱ्यांना (Gujrat) वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळाने रौद्र रुप धारण केले असून त्यामुळं समुद्राला उधाण आलं आहे. त्याचदरम्यान सोमवारी द्वारकायेथील जगत मंदिरात (Dwarkadhish Temple Flag) एकाचवेळी दोन ध्वज फडकवण्यात आले आल्याचे समोर आले. काही भाविकांच्या दाव्यानुसार, चक्रीवादळामुळं आलेले संकट दूर करण्यासाठी एकाचवेळी दोन ध्वज मंदिरावरील कळसावर फडकवण्यात आले आहे. इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 


जगत मंदिरात दोन ध्वज का फडकवण्यात आले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मंदिराच्या पुरोहिताने जगत मंदिरातील कळसावर दोन ध्वज का फडकवण्यात आले आहेत? याचे कारण स्पष्ट केले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळं द्वारकाधीश मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आलं नाही. म्हणून जुना ध्वज खाली घेऊन त्याजागी नवीन ध्वज फडकवण्यात आला आहे. काही भाविकांच्या मते चक्रीवादळाचे संकट टाळण्यासाठी दोन ध्वज फडकवण्यात आले आहेत. मात्र, हे खरं नाहीये. वादळाची शक्यता असताना कळसावर ध्वज फडकवण्यासाठी मंदिरावर चढणे शक्य नाहीये. म्हणून सुरक्षेचा विचार करुन दोन झेंडे फडवण्यात आले आहे. यापूर्वीही असाच निर्णय घेण्यात आला होता.


कळसावर ध्वज फडकावणे कठिण असते


द्वारकेतील जगत मंदिराच्या कळसावर रोज पाचवेळा ध्वज फडकवण्यात येतो. सोमवारी सकाळी ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर आधी फडकवण्यात आलेल्या झेंड्याच्या खालीच नवीन ध्वज फडकावण्यात आला. मंदिरावर असलेले दोन झेंडे पाहून लोकांनी अनेक निरनिराळे तर्क लावले होते. खरंतर, मंदिरावरील कळसावर ध्वज फडकावणे धोक्याचे आहे. कारण वादळामुळं सोसाट्याचा वारा सुटला आहे. त्यामुळं कळसावर चढणे धोक्याचे आहे. म्हणूनच जुना ध्वज न काढता त्याखालीच नवा झेंडा फडकावला आहे. 


याआधीही घडली होती अशी घटना


यापूर्वीही एकदा अशीच घटना घडली होती. गुजरातचे मोरबी धरणे ओव्हरफ्लो झाले होते तेव्हा अतिवृष्टी झाली होती. त्यावेळेस दोन ध्वज लावण्यात आले होते. मंदिराचे 50 मीटर उंच कळसावर 52 गजाचे ध्वज दिवसातून 5 वेळा बदलला जातो. यापूर्वी मे 2021मध्ये गुजरातला धडकणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दोन ध्वज फडकवण्यात आले होते. या झेंड्याला रक्षा ध्वज असं म्हणतात. भाविकांच्या मान्यतेनुसार, हा ध्वज मंदिर आणि शहराचे रक्षण करतो