Uttarakhand Accident : उत्तराखंडमधील  (Uttarkashi) उत्तरकाशी येथील भटवाडी तहसील अंतर्गत गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर (Gangotri National Highway) गंगनानीजवळ प्रवाशांची बस दरीत कोसळली आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात रविवारी गुजरातमधून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 28 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 35 प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी स्थानिक प्रशासनाला जलद मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगोत्री धाम येथून परतणाऱ्या गुजरातमधील यात्रेकरूंनी भरलेल्या बसला गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस गंगनानीजवळ अचानक कोसळून खोल दरीत कोसळली. या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे 28 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलिसांचे बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


कसा झाला अपघात?


प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, चालकाने घाटात वळणावर बस फिरवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाल्याने बस खोल दरीत कोसळली. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गुजरातमधील अश्विनी चंद या प्रवाशाने या अपघाताची माहिती देताना देताना सांगितले की, गंगनानीजवळील अरुंद रस्त्यावर वळण घेण्याऐवजी बस थेट खोल दरीत कोसळली.


म्हणून वाचला इतर प्रवाशांचा जीव


जिथे बस दरीत कोसळली तिथे आधीच एक अपघातग्रस्त ट्रक कोसळून पडला होता. बस खाली पडताच ट्रकमुळे तिथेच अडकली. जर दरीत ट्रक नसता तर बस थेट भागीरथी नदीत पडली असती आणि आणखी लोकांचा बळी गेला असता, असे बचावलेल्या प्रवाशाने सांगितले. सर्व भाविक हे गुजरातच्या भावनगर येथील रहिवासी होते.


दरम्यान, या अपघाताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तात्काळ प्रशासनाला मदत पोहोचवण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री धामी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रेमचंद अग्रवाल आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी फोनवर बोलून घटनास्थळी सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी पाठवली. दुसरीकडे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रविवारी उत्तराखंडमध्ये बस अपघातात राज्यातील सात यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याबद्दल शोक व्यक्त केला. यासोबतच प्रशासन उत्तराखंड प्रशासनाच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.