नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीनंतर आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. भाजप आणि मित्र पक्षाकडून व्यंकय्या नायडू तर काँग्रेस लोकशाही आघाडीचे उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांच्यामध्ये आज लढत होत आहे. मात्र, 'एनडीए'कडील बहुमत लक्षात घेतल्यास नायडूंचा विजय निश्चित मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी १० ते सायंकाळ ५ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता मतमोजणीही चालू होईल. रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.


उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करीत असतात. या निवडणुकीत ७९० मतदार आहेत. स्वत: एनडीएकडे ४२५ मते आहेत. शिवाय त्यांना अण्णाद्रमुक, तेलंगणा राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेससारख्या काही कुंपणावरच्या पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे विजयासाठी ३९६ मतांची आवश्यकता असताना नायडूंना मिळणाऱ्या मतांची संख्या ५०० टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.


राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या बिजू जनता दल आणि संयुक्त जनता दलाने उपराष्ट्रपतिपदासाठी गांधी यांना पाठिंबा दिला आहे. भाजपशी हातमिळवणी केल्यानंतरही मुख्यमंत्री नितीशकुमार गांधींच्या पाठिंब्यावर ठाम राहिले आहेत. महात्मा गांधीजींचे नातू असलेले डॉ. गोपाळकृष्ण गांधी हे पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत.