India Maldives Tensions: पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर आणि याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मालदिवचा जळफळाट होत आहे. मालदिवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर काही आपत्तीजनक ट्विट केले आहेत. त्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात मालदिवविरोधात संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर तर #boycottmaldives हा ट्रेंड सुरू करण्यात आला होता. तर, अनेकांनी मालदिवची ट्रिप रद्द करत धडा शिकवला आहे. या गदारोळानंतर मालदिवने तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. त्यानंतर मालदिवची चर्चा वेगाने रंगतेय. लोकही सोशल मीडियावर मालदिवसंबंधीत सर्च करत आहेत. तर आज जाणून घेऊया मालदिव या शब्दाचा अर्थ काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद यांनी सोशल मीडियावरुन केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं भारतातील वातावरण गढूळ झाले आहे. त्यांच्या विधानावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मालदिव चर्चेत आला आहे. मालदिव या देशाचा इतिहास, नाव याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. तर आज जाणून घेऊया. मालदिव या नावाचा अर्थ काय 


मालदिवचा अर्थ काय?


मालदिव हा शब्द मलयालमपासून आला असल्याचे म्हटलं जाते. यातील माल या शब्दाचा अर्थ आहे रांग, माळ असाही होतो. तर. दिवचा अर्थ द्वीप म्हणजेच द्वीपाची माळ असा त्याचा पूर्ण अर्थ होतो. तर, प्राचीन श्रीलंकेचे लेखक महावंशा यांनी मालदिवला महिलादिवा असंही म्हटलं होतं. याचा अर्थ महिलाद्वीप असा होतो. 


मालदिवमध्ये किती भारतीय राहतात?


परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, मालदिवमध्ये एनआरआय भारतीयांची संख्या 25000 इतकी आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांच्या संख्या 108 आहे. म्हणजेच एकूण भारतीयांची संख्या 25108 आहे. भारतीय लोक दरवर्षी मोठ्या प्रमाणात मालदीवला फिरण्यासाठी जातात. खासकरुन, बॉलिवूड सेलिब्रेटीजसाठी मालदिव खास डेस्टिनेशन आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेते तिथे फिरण्यासाठी जातात आणि सोशल मीडियावर त्यांचे फोटोही अपलोड करत असतात. 


दरम्यान, भारत नेहमीच मालदीवची मदत करत आला आहे. भारतीय लोकही लाखो रुपये खर्च करुन मालदीवला फिरण्यासाठी जातात. पर्यटनावरच देशाची अर्थव्यवस्था टिकून आहे. लोकांना रोजगार मिळतो. असं असतानाही मालदीव भारताविरोधात टिप्पणी करतात. मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मोइजू सुरुवातीपासून भारताच्या विरोधात असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी पदभार स्कीकारल्यानंतर पहिले तुर्कीची यात्रा केली आणि नंतर चीनला जाण्याचा विचार बोलून दाखवला होता.