नवी दिल्ली:  पंतप्रधान होण्याचे स्वप्न बहुतांश नेते मंडळी बघत असतात. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवावा आणि देशवासियांना संबोधित करावे अशी महत्त्वकांक्षा अनेक नेत्यांची असते. पण असेही एक पंतप्रधान होऊन गेले त्यांना त्यांच्या कार्यकाळात झेंडा फडकविण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे असे दोन पंतप्रधान आपल्या देशात झाले ज्यांना हा क्षण अनुभवता आला नाही. त्यातील एक तर दोनदा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसले होते.
 
 हो. आम्ही सांगतोय ते गुलजारी लाल नंदा आणि चंद्रशेखर यांच्याविषयी. नंदा दोनवेळा १३-१३ दिवसांसाठी पंतप्रधान झाले. पहिल्यावेळी २७ मे ते ९ जून १९६४ आणि दुसऱ्या वेळेस ११ ते २४ जानेवारी १९६६  दरम्यान ते पंतप्रधान झाले होते. 
 
 नंदा पहिल्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर आणि दुसऱ्या वेळेस लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर कार्यवाहक पंतप्रधान बनले होते. कॉंग्रेसने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करेपर्यंतच या दोन्ही कार्यकाळात ते पंतप्रधान होते. 
 
 चंद्रशेखर दूसरे असे पंतप्रधान होते ज्यांना लाल किल्ल्यावरून झेंडा फडकविण्याची संधी मिळाली नाही. ते १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिले.