नवी दिल्ली : भारताबाबतचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.  ग्लोबल हंगर इंडेक्सद्वारा (GHI) जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, ११७ देशांमध्ये भारत १०२ व्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. २०१४ पासून भारताच्या क्रमांकात सतत  घट होत आहे. २०१४ मध्ये भारत ७७ देशांमध्ये ५५ व्या क्रमांकावर होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हंगर इंडेक्स ही जागतिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर कोणत्या भागात किती उपासमारी आहे? किती लोक रोज भुकेपोटी उपाशी राहतात याचे मापन करणारा हा अहवाल आहे. कुपोषण, बाल मृत्यूदर, वयानुसार कमी वाढ (child stunting), उंचीनुसार कमी वजन (child wasting)या अहवालात जगभरातील कुपोषण आणि उपासमारीची नोंद अशा चार प्रमाणात केली आहे. 


विषेश बाब म्हणजे, या अहवालात भारत पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंकेहून मागे आहे. या इंडेक्समध्ये पाकिस्तान ९४व्या क्रमांकावर, बांग्लादेश ८८व्या तर श्रीलंका ६६व्या क्रमांकावर आहे.


हा अहवाल Welthungerhilfe आणि Concern Worldwide नावाच्या संस्थेने तयार केला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, जगातील ४५ देशांमध्ये भारत असा देश आहे जिथे उपासमारीची परिस्थिती अतिशय गंभीर, चिंताजनक आहे. 


अहवालानुसार, भारतात ६ ते २३ महिन्यांमधील केवळ ९.६ टक्के मुलांना कमीतकमी पौष्टिक आहार मिळतो. २०१५-१६ पर्यंत ९० टक्के भारतीय कुटुंबात पिण्याच्या पाण्याचा चांगला स्रोत आहे, तर ३९ टक्के कुटुंबांमध्ये स्वच्छतेची कोणतीही सुविधा नसल्याचे समोर आले आहे.


अहवालात, नेपाळ आणि बांग्लादेश या देशांनी लहान मुलांच्या पोषण आहाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याचे सांगण्यात आले आहे.