नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची विनंती केली. अर्थात, आपण केवळ विनंतीच करू शकतो, मागणी करू शकत नाही असंही रेड्डी यांनी कबुल केलं. एनडीए २५० जागांवर अडकली असती तर पाठिंब्याच्या बदल्यात आपण आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा आणला असता, मात्र आता ते शक्य नसल्याचं रेड्डी म्हणाले. राज्याच्या डोक्यावर २ पूर्णांक ५८ लाख कोटींचं कर्ज असून केंद्रानं त्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधानांना केली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या. या निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीचा दारूण पराभव केला. लोकसभेच्या २५ जागांपैकी २२ जागांवर आणि विधानसभेच्या १७५ जागांपैकी १५१ जागांवर वायएसआर काँग्रेसचा विजय झाला.


लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ३०३ जागांवर विजय मिळवला. २०१४ साली झालेल्या निवडणुकांपेक्षा भाजपला २२ जागा जास्त जिंकला आल्या. तर भाजप आणि घटकपक्ष मिळून ५४२ पैकी ३५२ जागा मिळाल्या.