नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्याबाबतीत एक रंजक गोष्ट समोर आली आहे. यापैकी अनेक दहशतवादी हे त्यांच्या प्रेमिकांमुळे लष्कराच्या जाळ्यात फसले आहेत. याचे उदाहरण म्हणून काश्मीरमधील मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसा याच्याकडे पाहता येईल. काही दिवसांपूर्वी त्रालमध्ये भारतीय लष्करासोबत झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाल होता. मात्र, आता सगळ्यामागचे आणखी एक कारण समोर आले आहे. झाकीर मुसा याचा मृत्यू झाला तेव्हा तो आपल्या दुसऱ्या प्रेमिकेला भेटायला गेला होता. ही गोष्ट त्याच्या पहिल्या प्रेमिकेला न आवडल्यामुळे तिने रागाच्या भरात लष्कराला झाकीरचा ठावठिकाणा सांगितला. या माहितीच्याआधारे लष्कराने झाकीरला घेराव घालून चकमकीत ठार केले. झाकीरने चंदीगडमधून अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले होते. शिक्षण अर्धवट सोडून झाकीर दक्षिण काश्मीरमधील पुलवामामधील मूळगावी परतला. कट्टर इस्लामी साहित्यामुळे झाकीर मुसा दहशतवादाकडे वळला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वीही अनेक दहशतवादी अशाचप्रकारे लष्कराच्या जाळ्यात सापडले आहेत. अनेकजण आपल्या प्रेमिकांना भेटण्यासाठी येतात तेव्हा लष्कराला त्यांची माहिती मिळते. यामध्ये समीर टायगर, सलमान बट्ट, सैफुल्लाह यांच्यासारख्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.  


बुरहान वानीही अशाचप्रकारे चकमकीत ठार झाला होता. त्याचे अनेक मुलींशी संबंध होते. यापैकी एका मुलीने लष्कराला त्याच्याबद्दल माहिती दिली होती. तिने बुरहान वानीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या मुलींचे नंबर बघितले होते. त्यामुळे तिनेही रागाच्या भरात लष्कराला बुरहान वानीचा ठावठिकाणा सांगितला होता. त्यामुळे आता दहशतवाद्यांना प्रशिक्षण देताना प्रेमात न पडण्याची सक्त ताकदी दिली जात असल्याचेही माहिती समोर आली आहे.