37 Componies To Exit Hinjewadi IT Park Ravindra Dhangekar React: पुण्याला आयटी हब अशी नवी ओळख मिळवून देणाऱ्या हिंजवडीमधून 37 कंपन्या लवकरच बाहेर पडणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. वाहतूककोंडीला कंटाळून या कंपन्यांनी आपला तळ हालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झालेले असतानाच काँग्रेसचे पुण्यातील नेते तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी या विषयावर पहिली प्रतिक्रिया आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नोंदवली आहे. "हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल 37 कंपन्या बाहेर गेल्या असल्याची बातमी आपलं टेन्शन वाढवणारी आहे," असं धंगेकर यांनी म्हटलं आहे. 


त्याचेच हे परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धंगेकर यांनी आपलं म्हणणं मांडताना, "एक तर सरकार आपल्या पुण्यात नवा रोजगार आणण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आता ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा पुण्याच्या बाहेर गेल्यात आणि यासाठी कारण देण्यात आले आहे ट्राफिक जॅमचं! गेल्या दहा वर्षात पुणे शहराच्या पायाभूत सुविधांवर नीट नियोजन करून कामे केले नसल्यामुळे सगळे परिणाम आज आपल्याला भोगायला लागत आहेत," असं म्हटलं आहे.


वाहतूक कोंडी का होते? धंगेकरांनी सांगितलं कारण


"कुठल्याही सर्वसामान्य माणसाला सकाळी घरून ऑफिसला जायला दोन - दोन तास लागायला लागलेत तर ऑफिस मधून घरी येताना सुद्धा दोन-तीन तासांचा प्रवास होतोय. महापालिकेकडून पुणेकरांची जीवनशैली सुसह्य करण्यासाठी काम करण्याचं आव आणून नको त्या गोष्टींवरती पैसे खर्च करण्यात आले आहेत," असं धंगेकरांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, "महत्त्वाचे चौक, मोठे जंक्शन या ठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेप्रेटर टाकून वाहतूक कोंडी कमी करता आली असती. मात्र कोणीही या गोष्टींकडे पुढच्या 40-50 वर्षांचे नियोजन म्हणून पाहत नाही," असं म्हणत धंगेकरांनी शहर नियोजन विकासाचा आभाव असल्याचं अधोरेखित केलं आहे.


नक्की वाचा >> 'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला


पुणेकरांची थोडीफार काळजी असेल तर..


"पोलिसांच्या वाहतूक विभागाचे देखील यात अक्षम्य दुर्लक्ष होतंय. सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस वर्करची गर्दी रस्त्यावर असताना प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस, वॉर्डन उपस्थित राहिलेच पाहिजे. सदर बाबतीत जर पुणेकरांची थोडीफार काळजी असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व या प्रकारापासून अनभिज्ञ असलेले उद्योगमंत्री यांनी योग्य ती पाऊले उचलावीत," असं धंगेकर यांनी म्हटलं आहे. 


युद्ध पातळीवर उपाययोजना


"पुण्याच्या वाहतूक कोंडीबाबत युद्ध पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे," असंही धंगेकरांनी या पोस्ट सोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटलं आहे. 



किती कंपन्या आहेत हिंजवडीत?


हिंजवडीमध्ये एकूण 150 कंपन्या असून या कंपन्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे 5 लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे. यापैकी 37 कंपन्या निघून गेल्या तर मोठ्याप्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.