रत्नागिरी : जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असून, भटकी कुत्री आता माणसांवरही हल्ले करू लागली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रूग्णांची संख्या वाढली आहे. मागील चार महिन्यांत तब्बल २ हजार २०५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे. शहरासह ग्रामीण भागात कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने श्वानदंशाचे प्रकार वाढत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यात श्वानांना सहज खाद्य उपलब्ध होते. ग्रामीण भागात तर जागोजागी असा कचरा पडलेला असतो. त्यामुळे श्वानांची संख्या वाढत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आडवे आल्याने अपघात तर होतात; शिवाय श्वानदंशाच्या घटनाही वाढत आहेत. नागरिकांवर हल्ला करून त्यांना चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत.


गावातील सरकारी दवाखान्यांत रोज असे रुग्ण येत असल्याचे येथील वैद्यकिय अधिकारी सांगतात. रुग्णांची वाढती संख्या पाहिल्यास श्वानदंशाची समस्या वाढत चालल्याचे दिसत आहे. मागील चार महिन्यांत २ हजार २०४ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ५५९ जणांना, फेब्रुवारी महिन्यात ५६६, मार्च ५९८ आणि एप्रिल महिन्यात ४८२ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.