नंदुरबार: संपूर्ण राज्यभरात शुक्रवारी पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होत आहे. या सोहळ्याला नंदुरबारमधील एका घटनेने गालबोट लागले आहे. नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यातल्या वडछील गावात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहा तरुण बुडाल्याचे सांगितले जाते.
 
कैलास संजय चित्रकथे, सचिन सुरेश चित्रकथे, रविंद्र शंकर चित्रकथे, विशाल मंगल चित्रकथे, दीपक सुरेश चित्रकथे, सागर आप्पा चित्रकथे अशी या मृतांची नावे आहेत. या सर्वांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी म्हसावाद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 


दरम्यान, राज्याच्या इतर भागांमध्ये लाडक्या बाप्पाला वाजतगाजत निरोप दिला जात आहे. अनेक नदी आणि तलावात गणेशमूर्तींचं वाजतगाजत विसर्जन होत आहे. विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन यंत्रणा पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे.