Crime News: एकतर्फी प्रेमातून बहिणीमागे लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाची मुलीच्या भावाने हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमधील (Nashik) आडगाव परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. एका आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विकास रमेश नलावडे असं मृत तरुणाचं नाव आहे. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयत विकास रमेश नलावडे निलगिरी बाग परिसरात राहत होता. विकासचं त्याच्या परिसरातील एका तरुणीवर प्रेम होतं. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. त्यामुळे विकासने सदर तरुणीकडे सतत लग्नासाठी तगादा लावला होता. यामुळे संशयित आरोपींनी विकासला अनेकदा समजावण्याचादेखील प्रयत्न केला होता. तरीही विकासने तरुणीच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता.


मुलीच्या भावाला या गोष्टीचा राग आल्याने त्याने बुधवारी रात्री 10.30  वाजण्याच्या सुमारास निलगिरी बाग परिसरातील मोकळ्या जागेत विकासला याचा जाब विचारला. "तू माझ्या बहिणीशी लग्न करायचे असे का बोलतो" अशी विचारणा करत अमोल साळवे व त्याच्या दोन साथीदारांनी विकासला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेतील मुख्य संशयित आरोपी अमोल साळवे याने धारदार शस्त्राने विकास याच्या पोटात आणि डोक्यात जबर वार करून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारले.


पोलिसांनी याप्रकरणी अमोल वसंत साळवे याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्यासोबत त्याचा मामा सुनील मोरे व त्याचा दाजी राहुल भीमराव उजगीरे होते असा खुलासा केला. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने सुनील मोरे यास ताब्यात घेतले असून तिसरा संशयित आरोपी राहुल उजागिरे हा हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे.