Chhatrapati Sambhaji Maharaj : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन सध्या जोरदार वाद सुरु आहे. विधानसभेत बोलत असताना छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर (dharmveer) नसून स्वराज्यरक्षक होते, असे विधान अजित पवार यांनी केले होते. अजित पवार यांच्या विधानावरुन राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी एक खबळबळजनक ट्वीट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले होते अजित पवार?


"महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला हवी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक त्यांचा धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असताना त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं की, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा," अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती. 


 एका वर्गाकडून संभाजीराजे यांना बदनाम करण्याचे काम - जितेंद्र आव्हाड


"सावरकरांनी व माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी ह्यांच्या बद्दल काय लिहून ठेवले ते वाचा. ह्या शूर विरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले.सावरकर आणि गोळवळकरांच्या दृष्टींनी संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते कोणी बोलेल ह्याच्या वर," असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये काही पुस्तकाची संदर्भ दिला आहे. 


"शंभू राजे स्वराज्य रक्षक आणि धर्म रक्षक ही जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी रयते साठी निर्माण केले त्याचे रक्षण करण्याचे काम शंभू राजेंनी केले. त्यांना धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म सगळ्यांना सामावून घेणारा मराठा धर्म अभिप्रेत होता. त्यामुळे स्वराज्य आणि धर्म बाजूला कसे काढता येतील," असेही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.



अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचं -  संभाजीराजे छत्रपती


संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
"छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, हे निश्चित आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं सुद्धा रक्षक केलं, हे कोणीही नाकारू शकत नाही. संभाजी महाराज हे स्वराज्याचे आणि धर्माचे रक्षक तसेच धर्मवीर आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे विधान केलं, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कोणत्याही बाबत अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून, अर्धसत्य बोलले आहेत," असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.