Abdul Sattar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सचिवांसोबत राडा घातल्यानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) चर्चेचा विषय होते. अशातच आता बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. राज्यात पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेकांना दिवाळी साजरी करता आली नाही. मात्र, राज्याचे कृषीमंत्री वेगळ्याच मुडमध्ये दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सत्तार यांनी चहा पिता पिता तुम्ही दारू पिता का, असा अजब सवाल जिल्हाधिकाऱ्यांना केला. त्यामुळे आता सत्तरांच्या व्हिडीओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर आणि काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले असताना व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.


पाहा व्हिडीओ - 



बोलणं सुरू असताना मी चहा कमी पितो, असं जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा (District collector beed) यांनी म्हटलं. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी अचानक दारू पिता का?, असा सवाल विचारला. कोणालाही प्रश्न अनपेक्षित नव्हता, त्यामुळे उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकल्याचं दिसून आलंय. मात्र, त्यावेळी कॅमेरा सुरू होता, हे सत्तारांच्या लक्षात आलं नाही. त्यानंतर त्यांनी कॅमेरा बंद करण्याच्या सुचना दिल्या.


आदित्य ठाकरेंची टीका -


अब्दुल सत्तार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होताना दिसत आहे. सत्तारांच्या वादग्रस्त व्हायरल व्हिडिओमुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्याची मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केलीय. अतिवृष्टीची मदत न मिळाल्यामुळे शेतकरी बेजार झालेला असताना कृषी मंत्र्यांना दारूची पडलेली आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी सत्तारांवर केली. 


आणखी वाचा - वाद टोकाला! 'अस्तित्वावर बोट ठेवलं तर ते छाटू...'


दरम्यान, जोरदार पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी परिस्थिती नाही, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.