Rohit Patil On Ajit Pawar revolt: वस्तादाविरुद्ध शड्डू ठोकत अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाचव्यांदा अजित पवारांनी शपथ घेतल्याने आता राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. त्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय डावपेच खेळण्यास सुरूवात केली आहे. याची सुरूवात शरद पवार यांनी कराडमधून सुरू केली. कराडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आज हजेरी लावली आणि शरद पवारांना समर्थन दिलं. त्यावेळी माजी गृहमंत्री आर आर पाटील (R R Patil) यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी देखील शरद पवारांना भावनिक साथ दिल्याचं पहायला मिळतंय.


काय म्हणाले रोहित पाटील?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आबांना मंत्रिपदाची संधी शरद पवार यांनीच दिली. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती की शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करुन त्यांना पाठिंबा द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी फुटला असं शरद पवारही बोलले नाहीत किंवा आम्हीसुद्धा बोलणार नाहीत. राष्ट्रवादी हा लोकांमधला पक्ष आहे. सर्वसामान्य माणूस राष्ट्रवादीचा घटक आहे. गेली तीस वर्षे काबाडकष्ट करुन हा पक्ष उभा करण्यात आला आहे. आज जर आबा असते तर ते शरद पवार यांच्यासोबतच असते या विचारानेच आम्ही इथं आलेले आहोत, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.


आणखी वाचा - 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या


येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सामोरं जाऊ. आबांना गृहमंत्रीपदांची आणि उपमुख्यमंत्रीपदाची संधी ही शरद पवार साहेबांनी दिली. आमच्या सर्व सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की शरद पवार यांच्यासह उभं रहावं. तीस ते पस्तीस वर्ष झाली, सर्वांनी कष्ट केलंय. येणारी निवडणूक आम्ही घड्याळ या चिन्हावरच लढवणार आहे, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.



दरम्यान, शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलीये. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली.