अहमदनगर : शेतकरी संपाची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळण्याची स्थिती बघता आता संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात संपाविषयी आज अण्णा हजारे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोंडी फोडण्यासाठी अण्णा हजारे मध्यस्थी करणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यासाठी अण्णा हजारे आजच दुपारी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट करतील असं बोललं जातं आहे. नगर जिल्ह्यातील पुणतांबा हे शेतकरी संपाचं केंद्र आहे. अण्णा हजारेही नगर जिल्ह्यातलेच असल्यानं त्याच्या मताकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे.


शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्यभरातून या संपाला उस्त्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आज या संपाचे परिणाम राज्यभर बघायला मिळत आहेत. बाजार समित्यांमध्ये मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. नवी मुंबईतल्या बाजारात 146 गाड्या आवक झाली आहे. त्यापैकी फक्त 15च गाड्या महाराष्ट्रातल्या आहेत. तर तिकडे पुण्यात दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे.


दूध संकलन 50 टक्क्यांनी कमी झालं आहे. मुंबईतील दादर मंडईत कांदेपात, टोमॅटोचे ट्रकच आलेले नाहीत. नाशिकमध्ये कालपासून बाजारसमित्या ओस पडायला सुरूवात झाली आहे. मालाची आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर आपोआपच वाढायला सुरूवात झाली आहे. नवी मुंबईत घाऊक बाजारात कोथिंबीरीच्या एका जुडीचा भाव 100 रुपयाच्या घरात पोहोचला आहे.