निलेश वाघ, झी मीडिया, सटाणा : सफरचंदाची बाग म्हटलं की थंड हवेचा प्रदेशाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. मग ते जम्मू काश्मिर असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल...मात्र महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या माळरानावर सफरचंदाची बाग फुलवली आहे. दरम्यान नाशिकमध्ये असलेल्या या सफरचंदाची बाग पाहण्यासाठी परिसरातील इतर शेतकरी मात्र गर्दी करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील उष्ण तापमान असलेल्या आखातवाडेमध्ये 26 वर्षीय चंद्रकांत ह्याळीज यांनी सफारचंदाची बाग फुलवली आहे. अखातवाडेच्या प्रगतशील युवा शेतकरी चंद्रकांत ह्याळीज यांचा सुरवातीपासून शेतीत नवनवे प्रयोग करण्याचा हातखंडा आहे. त्यांची वाडलोपार्जीत 5 एकर शेतजमीन आहे. सुरवातीला त्यांनी या ठिकाणी डाळींबाची लागवड केली. डाळींबाने त्यांना भरभराटही दिली मात्र तेल्या रोगाने त्याचं नुकसान झालं. मात्र खचून न जाता डाळींबाला पर्याय म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास केला आणि फळबागांकडे वळण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी द्राक्षांसह विविध फळबागांचा प्रयोग यशस्वी केला. डाळींबाची रोपं हिमाचल परदेशातही पाठवली. 


दरम्यान उष्ण तापमानात येणारी सफरचंद जातीचीही रोपं असल्याचं त्यांना समजलं. यानंतर त्यांनी सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी चंद्रकांत यांनी अभ्यास केला आणि मार्गदर्शन घेतलं. साधारणतः 40 ते 45 डिग्री तापमानात येणाऱ्या हरमन-99 जातीच्या रोपांची त्यांनी निवड केली. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर 50 रोपांची लागवड केली असता तिसऱ्या वर्षी बहर धरला. या बागेत आता सफरचंदाची फळधारणा झाली आहे. विशेष म्हणजे या फळांना चांगला रंग, आकार आणि चवही आहे. पुढच्या काळात आता मोठ्या प्रमाणावर सफरचंदाचं उत्पन्न येण्याची त्यांना आशा आहे.


सटाण्यासारख्या माळरानावर चंद्रकांत ह्याळीज यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. ह्याळीज यांची सफरचंदाची बाग पाहण्यासाठी शेतकरी बागेला भेट देत लागवडीबाबत माहिती घेत आहे. ह्याळीज हे देखील सफरचंद लागवडीबाबत मार्गदर्शन करतात. प्रामुख्याने हंगामी पीकं आणि डाळींब उत्पादनात आघाडीवर असलेल्या सटाणा तालुक्यातील अखातवाड्यात सफरचंदाची बाग फुलल्याने परिसरातील शेतकऱ्यांना एक नवा पर्याय निर्माण झाला आहे.