अमर काणे, झी मीडिया, नागपूर : गेल्या पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा शिरकाव होत असल्यानं हे हल्ले वाढलेत का? की जंगलामध्ये मानवी अतिक्रमण वाढल्यानं हे हल्ले होतायत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  पाहूयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट...


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानव आणि वन्य प्राणी यांच्यातला संघर्ष अगदी आदिमानव युगापासून चालत आलेला. पण गेल्या काही वर्षांत हा संघर्ष आणखी तीव्र झालाय. कारण, जंगल आणि मानवी वस्त्या यांच्यातील सीमारेषाच दिवसेंदिवस पुसट होत चाललीय. त्यामुळे आपला अधिवास कोणता? हेच वन्य प्राण्यांना कळेनासं झालंय.


त्यातूनच भरवस्तीत वाघाचं दर्शन, लग्नाच्या मंडपात वाघाची उपस्थिती, चंद्रपूरच्या जंगलात वाघानं मजुरांचे डबे आणि घमेली पळवणं, रस्ता ओलांडताना वाघाचा झालेला मृत्यू असे प्रकार वाढलेत. एवढंच नव्हे तर प्रसंगी स्वतःच्या बचावासाठी वन्यप्राणी माणसांवर हल्ले करतायत.


गेल्या पाच वर्षांत अन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल २१७ नागरिकांनी जीव गमावला तर, २ हजार १७६ जण जखमी झालेत. एक नजर टाकूयात गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवर...


  • २०१३ मध्ये ४६

  • २०१४ मध्ये ३८

  • २०१५ मध्ये ३९

  • २०१६ मध्ये ५२ आणि

  • २०१७ मध्ये ४२ जणांचा मृत्यू झालाय.


या मृत्यूंना माणसंच जबाबदार असल्याचं सांगितलं जातंय. वन्यप्राण्यांचं निवासस्थान असलेल्या जंगलात माणसांनी घुसखोरी केल्यानं त्यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं वन्य जीव अभ्यासक सांगतात.


मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील हा संघर्ष आटोक्यात आणायचा असेल तर त्यासाठी निसर्ग आणि वन्य जीव यांच्याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. असं झालं तर मानवी मृत्यूही थांबतील आणि वन्यजीवांचेही रक्षण होईल.



स्पेशल रिपोर्ट | वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २१७ बळी