मुंबई : 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. युती आणि आघाडीची गणित ठरली असून जागावाटपांचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार हा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत व्यक्त केला. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास भाजपाच्या तमाम नेत्यांना आहे. फडणवीस पुन्हा परीक्षेला सामोरं जातायत. या निवडणुकीसाठी भाजपाची यंत्रणा कामाला लागलीच आहे. पण फडणवीसांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही एक प्लॅन आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघाची शिस्त, आदर्श आणि चारित्र्य ही शिदोरी घेऊन देवेंद्र फडणवीस राजकारणात उतरले. बाल स्वयंसेवक ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. संख्याबळाच्या जमवा-जमवीपासून मराठा आरक्षणापर्यंत वेळोवेळी आलेली सर्व आव्हाने त्यांनी लीलया पेलली. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही या स्वयंसेवकाला नेहमीच शाब्बासकी मिळत असते. 



थेट राजकारण कधीच करायचं नाही हे ब्रीद संघाने स्थापनेपासूनच जोपासले आहे. पण विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांना वेळोवेळी संघाची अप्रत्यक्ष मदत होते. तशीच मदत अर्थात देवेंद्र फडणवीसांनाही मिळते. म्हणूनच यंदा विधानसभेच्या निवडणुकीत 100 टक्के मतदानाचं आवाहन संघातर्फए केले जात आहे.


संघाची शिस्त आणि संघाचे संस्कार फडणवीसांच्या कामातही दिसते.बाल स्वयंसेवक ते मुख्यमंत्री हा फडणवीसांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या या वैयक्तीक प्रगतीत संघाचेही वैचारिक यश निहीत आहे. त्यामुळं संघाकडून त्यांना शाबासकीचं सहकार्य मिळणार हे निश्चित मानले जात आहे.