औरंगाबाद : दूध प्रश्नावर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या लाखगंगा गावात आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या ग्रामसभेला औरंगाबाद आणि नगर या दोन जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. या ग्रामसभेत दूध दराच्या निषेधार्थ ३ मे पासून दूध उत्पादक शेतकरी फुकट दूध वाटणार आहेत असा निर्णय घेण्यात येणार आहे,  राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला लिटरला २७ रुपये हमीभाव राज्य शासनाने जाहीर केला होता. या घोषणेला जवळपास वर्ष होत आहे. 

शेतकऱ्याला कवडीमोल भाव 


अद्याप याची अंमलबजावणी झाली नसल्यानं शेतकऱ्याच्या दुधाला कवडीमोल भाव मिळतोय. सध्या १६ ते १७ रुपये इतका एका लिटरला भाव मिळत असल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे गांधीगिरी मार्गाने दूध उत्पादक शेतकरी आता आंदोलन करणार आहेत. त्याची सुरुवात तीन मेपासून होणार असून शेतकरी मेला तरी चालेल सरकार आणि कारखाने सुखाने रहा असे सांगत दूध फुकट वाटण्यात येणार आहे. असा निर्णय शेतकरी घेणार आहेत.