Badlapur Case Akshay Shinde Death Jitendra Awhad Reacts:  बदलापूरमधील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला प्रमुख आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) सोमवारी मुंब्रा बायपास येथे मृत्यू झाला. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली की एन्काऊंटर करण्यात आला यावरुन वेगवेगळी मतं व्यक्त केली जात असतानाच या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. असं असतानाच या प्रकरणाची चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे. असं असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, "विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही. आम्हालाही हेच वाटतं, की या अक्षम्य व घृणास्पद कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशीच व्हायला हवी," असं म्हटलं आहे. मात्र याचवेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.


'बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच 3 गोष्टी घडल्या'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. यामध्ये आव्हाड यांनी, "बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच 3 गोष्टी घडल्या," असं म्हणत एक यादी दिली आहे. ती खालीलप्रमाणे: 


1. FIR दाखल करण्यात व अटक करण्यात उशीर
2. पोलिसांवर दबाव
3. शाळा व संस्थाचालकांची ओळख लपवण्याचा प्रयत्न


'हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो'


"या सगळ्यानंतर आज अक्षय शिंदे या आरोपीचा झालेला एन्काऊंटर हा संशयास्पद आहे, हे स्पष्ट आहे. शिंदेला शाळेतील काही गुपितं माहीत होती का? असा प्रश्न इथे उपस्थित होतो. यावरूनच शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे," असा आरोप आव्हाडांनी केला आहे. "हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो. या अशा घटना फक्त युपी-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारं राज्य आहे, त्याचा युपी-बिहार करू नका," असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. 


नक्की वाचा >> Akshay Shinde Death: 'फाशी झालीच पाहीजे होती पण..', शरद पवारांची प्रतिक्रिया! म्हणाले, 'भविष्यात अशा..'


"महाराष्ट्रातील जनता हे असे स्टंट..."


"विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही. आम्हालाही हेच वाटतं, की या अक्षम्य व घृणास्पद कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशीच व्हायला हवी. पण हे एन्काऊंटरसारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहेत. ही काही हुकूमशाही नाहीये, की राज्याच्या प्रमुखाच्या मनात आलं म्हणून कोणाचा तरी एन्काऊंटर केला. ही लोकशाही आहे. यात न्यायपालिकाच गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडितांना न्याय देते. कायद्याप्रमाणे फाशीही देता येतेच. सरकारने जलदगती न्यायालय आणि त्याची योग्य प्रक्रिया पार पाडली असती, तर 90 दिवसांत सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली गेली असती. पण या प्रकरणाच्या बाबतीत पॉलिटीकल हिरोइजम आणि जवळच्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नातच सरकार सुरुवातीपासून आहे," असा आरोपही आव्हाडांनी केला आहे. "महाराष्ट्रातील जनता हे असे स्टंट चांगली ओळखून आहे. ते ही कायदेहीन संस्कृती सहन करणार नाही," असं आव्हाड यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. 



पटोलेंचेही तीन प्रश्न


दरम्यान, दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या प्रकरणावरुन तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. पटोले यांनी सोमवारी रात्री आठच्या सुमारास आपल्या एक्स अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये, "बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वत:वर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ  केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत," असं म्हणत तीन प्रश्न उपस्थित केलेत. पटोलेंनी उपस्थित केलेले प्रश्न खालीलप्रमाणे...


1. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही?


2. फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? 


3. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का? 



"या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी," असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.